Tuesday, November 10, 2009

असे पाहुणे येती...

मी आणि दादा लहान असताना आमच्या घरी सतत पाहुणे असायचे. घरी कोणि पाहुणे येणार म्हटलं की आम्हा भावंडांच्या अक्षरश: अंगात येत असे. आणि त्यात जर पाहुण्यांना आमच्या वयाची मुलं असली की विचारायलाच नको. आमचा धुमाकुळ बघुन आईचा चेहरा मात्र बघण्यासारखा व्हायचा. आमची आई स्वभावाने अगदी गरीब आणि बाबा प्रचंड प्रेमळ असले तरी जमदग्निचा अवतार त्यामुळे बाबांनी अगदी वेळेवर जरी सांगितले की पाहुणे येणार आहेत तरी कपडे बदलुन बाहेर निघालेली आई निमुटपणे परत घरात कामाला लागलेली मला आठवते आहे.


आता मला जेव्हा या पाहुण्यांना तोंड द्यावं लागतं तेव्हा सारखी मला आई(आणि देव पण)आठवते. काय कुणास ठाऊक पण आमच्या राशीला सदैव पाहुणे लागलेले असतात :). माझा बोलघेवडा स्वभाव आणि नवर्‍याचा काय वाटेल ते झालं तरी नाही म्हणणार नाही चा नारा. त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा. आता तर आम्ही आदरातिथ्यात एकदम एक्स्पर्ट :) आणि प्रसिद्धही :( झालो आहोत.


आमच्या सोयीसाठी मी आणि नवर्‍याने पाहुण्यांची ढोबळमानाने दोन ग्रुप्स मधे विभागणी केली आहे. पहिला - भेटायला येऊन जेवुन खाऊन जाणारे पाहुणे आणि दुसरा - घरी रहायला येणारे पाहुणे. आणि दोन्ही प्रकारच्या पाहुण्यांचे इक्वली वाईट अनुभव आलेले आहेत. तरी त्यातल्यात्यात भेटायला येऊन जेवुन खाऊन जाणारे पाहुणे परवडले. मी लिहिणार आहे दोन्ही पाहुण्यांवर पण आजचा मान पटकावला आहे घरी रहायला येणार्‍या पाहुण्यांनी :).


आमचं नुकतंच लग्नं झालं होतं. आम्ही स्वत:च सेटल होत होतो अशात नवर्‍याने वर्दी दिली की त्याच्या मित्राची बदली त्याच गावात झाली असल्या कारणाने सुरवातिचे 10-12 दिवस तो आणि त्याची बायको आपल्या सोबत राह्तील. मी अगदी आनंदाने होकार दिला. नाहितरी मला तिथे कोणि मैत्रिण नव्हती त्यामुळे मी एकदम खुश. नवरा मात्र गालातल्या गालात हसत होता. पण माझ्या आनंदापुढे मी त्याच्या हसण्याकडे तेव्हा लक्षच दिलं नाही. आता मला कळतंय त्याला एवढं हसु कसलं येत होतं ते :). ते घर 4 खोल्यांच होतं. बैठकिची खोली, स्वयंपाकघर, आमची बेडरूम आणि देवघर. त्यांची व्यवस्था देवघरात केली होती. ठरल्या दिवशी आले. सुरवातिला एकदम मोकळे फ्रेंडली वाटले मनात म्हटलं चला सुरूवात तर छान झाली. पण नंतर वागण्याची एक एक तर्‍हा बघायला मिळाली. त्या मित्राची बायको 4 महिन्यांची प्रेग्नंट होती. त्यामुळे आधिच माझ्यावर जरा दडपण होतं. मी नवीन लग्न झालेली. काय खायला द्यायचं कसं द्यायचं एकुणच काही महिती नव्हतं. ती आरामात उठायची सकळी 9.30 / 10.00 ला. मग बाईसाहेबांना पलंगावरच आधि बेड टी द्यावा लागायचा. आधि हातात पाणि द्या मग चहा द्या. मग निवांत कधि कप तर कधि 2 कप चहापान व्हायचं. मग डुलतडुलत जायची आन्हिकं आटोपायला. आंघोळ झाली की मेक अप करून तयार व्हायला परत अर्धा तास. मला कळायचा नाही की घरीच तर बसायचं आहे तर मेक अप कशाला. मी आपली सकाळी सहाला उठुन केर वारे करून भराभर आंघोळ आटोपली की जो बुचडा बांधायची तो बाहेर जायचं नसेल तर तसाच. मग कपडे भिजवा, नाश्ता बनवा. नवर्‍याला द्या त्याच्या मित्राला द्या. ते दोघे नाश्ता करून निघुन जायचे. मग ती तयार झाली की हातात गरम नाश्ता परत कप 2 कप चहा. असा मनसोक्त नाश्ता झाला की निघुन जायची तिच्या एका मैत्रिणीकडे. मी परत घर आवर, जेवणाची तयारी कर. ह्यात वेळ जायचा. जेवायच्या वेळेला नवरा बायको यायचे जेवायचे आणि परत दुपारची झोप काढायला आपल्या खोलीत निघुन जायचे. झोप झाली की परत चहा आणि तयार होऊन बाहेर गेले की थेट रात्री साडे नऊ ला जेवायला यायचे. परत रात्रीचे जेवण झाले की त्यांच्यासोबत पत्ते खेळा. नाही म्हणायची सोय नाही कारण पाहुणचार करण्याचा पहिला वहिला अनुभव स्पॉइलस्पोर्ट व्हायचे नव्हते :). ते आरामात उठायचे त्यामुळे त्यांना झोप यायची नाही आणि मी डुलक्या घेत घेत आपले पत्ते दाखवत दाखवत कसाबसा खेळ संपायची वाट बघायची. एक दिवस तर तो मित्र चक्क घरातच नखं कापुन फरशीवर टाकत होता. मी म्हटलं अरे खाली पेपर वगैरे घे आताच केर फरशी झाली आहे. तर त्यावर हसुन म्हणाला काही होत नाही. मला अशिच सवय आहे आमच्याकडे आम्ही असेच करतो. ह्यावर काय बोलणार? त्याची बायको रेस्टरूम ला ज्या चपला घालुन जायची त्याच चपला घरभर वापरायची. मला किळस यायची. शिवाय त्यांची सोय देवखोलीत केली होती तिथेही ती त्याच चपला घालुन जायची. मला रहावलं नाही. तिला म्हटलं अगं निदान देवखोलीत तरी त्या चपला वपरू नकोस तर म्हणे आमच्या घरी आम्ही त्याच चपला वापरतो. मग मात्र मी तिला म्हटलं की तुल रेस्टरूम ला जायला आणि घरात वापरायला दोन वेगळे जोड देते मी. त्याच चपला घालु नकोस. एकुणच जरा त्रासदायक प्रकरण झालं. त्रास झाला तो झाला आणि वर अभ्यास पण बुडला तो वेगळाच.


त्यानंतर चा अनुभव आला दिड वर्षांपूर्वी. नवर्‍याने नेहेमीप्रमाणे या या घर आपलेच आहे म्हटल्यावर कोण नाही येणार? एक कुटुंब मुंबईला जायला निघाले होते. त्यांची आमची अजिबात ओळख नव्हती. केवळ नाव ऐकुन होतो. त्यांच्या गावापासुन डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळे आमच्याकडे 2 दिवस राहुन मग पुढे जाणार होते. गृहस्थ बायको आणि 2 मुलिंना सोडायला आले होते. मुंबईला बायको आणि पोरी तिघी जाणार होत्या आणि त्यांचे बाबा कामाच्या गावी परत जाणार होते. बाप रे ती बाई म्हणजे भयंकर प्रकरण होतं. तिच्या त्या दोघि पोरी बास हा शेवटचा दिवस असं मानुन धिंगाणा घालत होत्या. लिविंग रूम चं अक्षरश: समरांगण झालं होतं. सोफ्यावरचे सगळे कुशन्स खाली होते. कुठे कुठे जास्त धसमुसळे पणा केल्यामुळे उसवले होते. झाडांची पाने तोडुन घरभर विखुरली होती. डायनिंग टेबल च्या खुर्च्या बैठकिच्या खोलीत आणि सोफ्याचे सिंगल सिटर डायनिंग रूम मधे. लेकीच्या खेळण्यांची तर पार वाट लावली होती. लेकिच्या गोष्टिच्या आणि कवितांच्या पुस्तकांनी मारामारी केल्यामुळे सगळी पुस्तकं खिळखिळी झाली होती आणि काही काही पानं सुटी झाली होती. हे सगळं होत असताना त्या पोरींची आई मस्त बसुन होती आणि म्हणत होती मी ह्यांना सांभाळु शकत नाही. आपली पोरं एका अनोळख्या घरी धिंगाणा घालत असताना कोणि इतकं शांत कसं बसु शकत आश्चर्यच आहे. लेक तेव्हा अगदीच तान्ही काही महिन्यांची होती. मदतीला घरात कोणि नाही. नवरा पण नेमका तो आठवडा ऑफिसच्या कामाने गावाबाहेर गेला होता. बरं त्या पोरी वाढत्या वयाच्या त्यांना सारखी भुक लागायची. मग त्यांना खायला द्या. वर परत आंटी ये नही वो चाहिये. रिपीट नही चाहिये. अश्या फर्माईशी. आणि आई जणु काही आराम करायलाच आली होती. सारखं कुकिंग नाहितर भांडी घासणे (हाताने कारण डिशवॉशर नाहिये :)), व्हॅक्युम करणे, कपडे धुणे हेच सुरु होतं. एक दिवस त्या बाईला रात्रिचं जेवण बनवायला सांगितलं तर येत नाही म्हणुन तिने सरळ हात वर केले. मधे त्या बाईच्या नवर्‍याचा फोन आला तो तिला विचारत होता की कशि आहेस तर निर्लज्ज बाई म्हणते की मला नको रोहिणीलाच विचार कशि आहेस ते. तिला जास्त गरज आहे. अस्सा राग आला होता. मला अक्षरश: तिच्या झिंज्या उपटाव्याश्या वाटल्या :).. अशात त्यांची फ्लाईट रद्द झाली आणि पुढची फ्लाईट 4 दिवसानंतरची होती. फारच त्रासाचा ठरला तो आठवडा.


त्यानंतर चा अनुभव आला 7-8 महिन्यांपूर्वी. मी आईकडे गेले होते. नवरा आम्ही गेल्यावर 15 दिवसांनंतर येणार होता. नवर्‍याची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणुन मी त्याच्यासाठी बर्‍याच पोळ्या आणि पराठे बनवुन गेले होते. 15 दिवसांनी नवरा आल्याआल्या त्याला एक मेल आली. आमच्या परिचितांपैकी एका बाईला 4-5 दिवस आमचं घर रहायला हवं होतं कारण तिने भाड्याने घेतलेले घर रीपेयर्स साठी बंद होतं. आम्ही विचार केला ठिक आहे. नाहितरी घर रिकामं आहे. आणि ती बाई तिथे राहिली तरी आपल्याला काही करावं लागणार नाही. पण घरी परत आल्यावर डोक्याला हात लावुन घ्यायची वेळ आली. एक तर ती बाई 4-5 दिवस म्हणुन प्रत्यक्षात 15 दिवस राहिली. तिने फ्रिजमधल्या सगळ्या भाज्या संपवल्या होत्या. ग्रोसरी संपवली होती. दुध सगळं संपवलं. कॉलिंग कार्ड सगळं वापरलं. व्हॅक्युम केलं नाही. त्यामुळे घरात सगळीकडे धुळ झाली होती. मी नवर्‍यासाठी लाटलेल्या पोळ्या आणि पराठे नवर्‍यानेही खाल्ले नव्हते. त्याने ते वाचवुन ठेवले ह्या विचाराने की आल्याआल्या बायकोला परत लाटायला नको. तर ह्या बाईने त्या सगळ्या पोळ्या आणि पराठे सुद्धा संपवले. रेस्टरूम मधे कमोड वापरलं ते सुद्धा स्वच्छ केलं नाही आणि वर पडलेले पिवळे डाग दिसायला नको म्हणुन वरती हार्पिक घालुन ठेवलं होतं. फ्लश केल्यावर तिने केलेला चालुपणा लक्षात आला. ग्रोसरी, दुध, फळं भाज्या वापरल्या ते ठिक आहे. पण निदान परत घरात आणुन तरी ठेवावं. खाली दुकान आहे. असही नाही की 4 कोस जावं लागतं. आणि डोक्यात तिडिक गेली की गावात पाय ठेवल्या ठेवल्या घरी परतत असताना तिने फोन केला की घरात दुध संपलं आहे. तुमच्या मुलीसाठी लागेल तेव्हा घरी येता येता रस्त्यात थांबुन विकत घ्या म्हनजे फजिती होणार नाही. संताप झाला नुसता. घराखाली दुकान आहे तर म्हणे मला दिसलं नाही. ही बाई स्वत: ह्या गावात 4 वर्षांपासुन नोकरी करतेय. खालचं दुकान नाही सापडलं तर अजुन माहिती असलेल्या दुकानातुन वस्तु आणता आल्या असत्या. एवढं करूनही वर आभार नाही की दिलगिरी नाही. अगदी हद्द च केली त्या बाईने :(.


हे काही ठळक अनुभव. बारीक सारीक अनुभव तर बरेच आहेत. त्यामुळे आता पाहुणे यायचे म्हटले की अंगावर काटाच येतो. ते पाहुणे नको, शारिरीक, मानसिक आणि आर्थिक झीज नको आणि एकुणच होणारा मन:स्ताप ही नको.

;;