Tuesday, November 10, 2009

असे पाहुणे येती...

मी आणि दादा लहान असताना आमच्या घरी सतत पाहुणे असायचे. घरी कोणि पाहुणे येणार म्हटलं की आम्हा भावंडांच्या अक्षरश: अंगात येत असे. आणि त्यात जर पाहुण्यांना आमच्या वयाची मुलं असली की विचारायलाच नको. आमचा धुमाकुळ बघुन आईचा चेहरा मात्र बघण्यासारखा व्हायचा. आमची आई स्वभावाने अगदी गरीब आणि बाबा प्रचंड प्रेमळ असले तरी जमदग्निचा अवतार त्यामुळे बाबांनी अगदी वेळेवर जरी सांगितले की पाहुणे येणार आहेत तरी कपडे बदलुन बाहेर निघालेली आई निमुटपणे परत घरात कामाला लागलेली मला आठवते आहे.


आता मला जेव्हा या पाहुण्यांना तोंड द्यावं लागतं तेव्हा सारखी मला आई(आणि देव पण)आठवते. काय कुणास ठाऊक पण आमच्या राशीला सदैव पाहुणे लागलेले असतात :). माझा बोलघेवडा स्वभाव आणि नवर्‍याचा काय वाटेल ते झालं तरी नाही म्हणणार नाही चा नारा. त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा. आता तर आम्ही आदरातिथ्यात एकदम एक्स्पर्ट :) आणि प्रसिद्धही :( झालो आहोत.


आमच्या सोयीसाठी मी आणि नवर्‍याने पाहुण्यांची ढोबळमानाने दोन ग्रुप्स मधे विभागणी केली आहे. पहिला - भेटायला येऊन जेवुन खाऊन जाणारे पाहुणे आणि दुसरा - घरी रहायला येणारे पाहुणे. आणि दोन्ही प्रकारच्या पाहुण्यांचे इक्वली वाईट अनुभव आलेले आहेत. तरी त्यातल्यात्यात भेटायला येऊन जेवुन खाऊन जाणारे पाहुणे परवडले. मी लिहिणार आहे दोन्ही पाहुण्यांवर पण आजचा मान पटकावला आहे घरी रहायला येणार्‍या पाहुण्यांनी :).


आमचं नुकतंच लग्नं झालं होतं. आम्ही स्वत:च सेटल होत होतो अशात नवर्‍याने वर्दी दिली की त्याच्या मित्राची बदली त्याच गावात झाली असल्या कारणाने सुरवातिचे 10-12 दिवस तो आणि त्याची बायको आपल्या सोबत राह्तील. मी अगदी आनंदाने होकार दिला. नाहितरी मला तिथे कोणि मैत्रिण नव्हती त्यामुळे मी एकदम खुश. नवरा मात्र गालातल्या गालात हसत होता. पण माझ्या आनंदापुढे मी त्याच्या हसण्याकडे तेव्हा लक्षच दिलं नाही. आता मला कळतंय त्याला एवढं हसु कसलं येत होतं ते :). ते घर 4 खोल्यांच होतं. बैठकिची खोली, स्वयंपाकघर, आमची बेडरूम आणि देवघर. त्यांची व्यवस्था देवघरात केली होती. ठरल्या दिवशी आले. सुरवातिला एकदम मोकळे फ्रेंडली वाटले मनात म्हटलं चला सुरूवात तर छान झाली. पण नंतर वागण्याची एक एक तर्‍हा बघायला मिळाली. त्या मित्राची बायको 4 महिन्यांची प्रेग्नंट होती. त्यामुळे आधिच माझ्यावर जरा दडपण होतं. मी नवीन लग्न झालेली. काय खायला द्यायचं कसं द्यायचं एकुणच काही महिती नव्हतं. ती आरामात उठायची सकळी 9.30 / 10.00 ला. मग बाईसाहेबांना पलंगावरच आधि बेड टी द्यावा लागायचा. आधि हातात पाणि द्या मग चहा द्या. मग निवांत कधि कप तर कधि 2 कप चहापान व्हायचं. मग डुलतडुलत जायची आन्हिकं आटोपायला. आंघोळ झाली की मेक अप करून तयार व्हायला परत अर्धा तास. मला कळायचा नाही की घरीच तर बसायचं आहे तर मेक अप कशाला. मी आपली सकाळी सहाला उठुन केर वारे करून भराभर आंघोळ आटोपली की जो बुचडा बांधायची तो बाहेर जायचं नसेल तर तसाच. मग कपडे भिजवा, नाश्ता बनवा. नवर्‍याला द्या त्याच्या मित्राला द्या. ते दोघे नाश्ता करून निघुन जायचे. मग ती तयार झाली की हातात गरम नाश्ता परत कप 2 कप चहा. असा मनसोक्त नाश्ता झाला की निघुन जायची तिच्या एका मैत्रिणीकडे. मी परत घर आवर, जेवणाची तयारी कर. ह्यात वेळ जायचा. जेवायच्या वेळेला नवरा बायको यायचे जेवायचे आणि परत दुपारची झोप काढायला आपल्या खोलीत निघुन जायचे. झोप झाली की परत चहा आणि तयार होऊन बाहेर गेले की थेट रात्री साडे नऊ ला जेवायला यायचे. परत रात्रीचे जेवण झाले की त्यांच्यासोबत पत्ते खेळा. नाही म्हणायची सोय नाही कारण पाहुणचार करण्याचा पहिला वहिला अनुभव स्पॉइलस्पोर्ट व्हायचे नव्हते :). ते आरामात उठायचे त्यामुळे त्यांना झोप यायची नाही आणि मी डुलक्या घेत घेत आपले पत्ते दाखवत दाखवत कसाबसा खेळ संपायची वाट बघायची. एक दिवस तर तो मित्र चक्क घरातच नखं कापुन फरशीवर टाकत होता. मी म्हटलं अरे खाली पेपर वगैरे घे आताच केर फरशी झाली आहे. तर त्यावर हसुन म्हणाला काही होत नाही. मला अशिच सवय आहे आमच्याकडे आम्ही असेच करतो. ह्यावर काय बोलणार? त्याची बायको रेस्टरूम ला ज्या चपला घालुन जायची त्याच चपला घरभर वापरायची. मला किळस यायची. शिवाय त्यांची सोय देवखोलीत केली होती तिथेही ती त्याच चपला घालुन जायची. मला रहावलं नाही. तिला म्हटलं अगं निदान देवखोलीत तरी त्या चपला वपरू नकोस तर म्हणे आमच्या घरी आम्ही त्याच चपला वापरतो. मग मात्र मी तिला म्हटलं की तुल रेस्टरूम ला जायला आणि घरात वापरायला दोन वेगळे जोड देते मी. त्याच चपला घालु नकोस. एकुणच जरा त्रासदायक प्रकरण झालं. त्रास झाला तो झाला आणि वर अभ्यास पण बुडला तो वेगळाच.


त्यानंतर चा अनुभव आला दिड वर्षांपूर्वी. नवर्‍याने नेहेमीप्रमाणे या या घर आपलेच आहे म्हटल्यावर कोण नाही येणार? एक कुटुंब मुंबईला जायला निघाले होते. त्यांची आमची अजिबात ओळख नव्हती. केवळ नाव ऐकुन होतो. त्यांच्या गावापासुन डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळे आमच्याकडे 2 दिवस राहुन मग पुढे जाणार होते. गृहस्थ बायको आणि 2 मुलिंना सोडायला आले होते. मुंबईला बायको आणि पोरी तिघी जाणार होत्या आणि त्यांचे बाबा कामाच्या गावी परत जाणार होते. बाप रे ती बाई म्हणजे भयंकर प्रकरण होतं. तिच्या त्या दोघि पोरी बास हा शेवटचा दिवस असं मानुन धिंगाणा घालत होत्या. लिविंग रूम चं अक्षरश: समरांगण झालं होतं. सोफ्यावरचे सगळे कुशन्स खाली होते. कुठे कुठे जास्त धसमुसळे पणा केल्यामुळे उसवले होते. झाडांची पाने तोडुन घरभर विखुरली होती. डायनिंग टेबल च्या खुर्च्या बैठकिच्या खोलीत आणि सोफ्याचे सिंगल सिटर डायनिंग रूम मधे. लेकीच्या खेळण्यांची तर पार वाट लावली होती. लेकिच्या गोष्टिच्या आणि कवितांच्या पुस्तकांनी मारामारी केल्यामुळे सगळी पुस्तकं खिळखिळी झाली होती आणि काही काही पानं सुटी झाली होती. हे सगळं होत असताना त्या पोरींची आई मस्त बसुन होती आणि म्हणत होती मी ह्यांना सांभाळु शकत नाही. आपली पोरं एका अनोळख्या घरी धिंगाणा घालत असताना कोणि इतकं शांत कसं बसु शकत आश्चर्यच आहे. लेक तेव्हा अगदीच तान्ही काही महिन्यांची होती. मदतीला घरात कोणि नाही. नवरा पण नेमका तो आठवडा ऑफिसच्या कामाने गावाबाहेर गेला होता. बरं त्या पोरी वाढत्या वयाच्या त्यांना सारखी भुक लागायची. मग त्यांना खायला द्या. वर परत आंटी ये नही वो चाहिये. रिपीट नही चाहिये. अश्या फर्माईशी. आणि आई जणु काही आराम करायलाच आली होती. सारखं कुकिंग नाहितर भांडी घासणे (हाताने कारण डिशवॉशर नाहिये :)), व्हॅक्युम करणे, कपडे धुणे हेच सुरु होतं. एक दिवस त्या बाईला रात्रिचं जेवण बनवायला सांगितलं तर येत नाही म्हणुन तिने सरळ हात वर केले. मधे त्या बाईच्या नवर्‍याचा फोन आला तो तिला विचारत होता की कशि आहेस तर निर्लज्ज बाई म्हणते की मला नको रोहिणीलाच विचार कशि आहेस ते. तिला जास्त गरज आहे. अस्सा राग आला होता. मला अक्षरश: तिच्या झिंज्या उपटाव्याश्या वाटल्या :).. अशात त्यांची फ्लाईट रद्द झाली आणि पुढची फ्लाईट 4 दिवसानंतरची होती. फारच त्रासाचा ठरला तो आठवडा.


त्यानंतर चा अनुभव आला 7-8 महिन्यांपूर्वी. मी आईकडे गेले होते. नवरा आम्ही गेल्यावर 15 दिवसांनंतर येणार होता. नवर्‍याची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणुन मी त्याच्यासाठी बर्‍याच पोळ्या आणि पराठे बनवुन गेले होते. 15 दिवसांनी नवरा आल्याआल्या त्याला एक मेल आली. आमच्या परिचितांपैकी एका बाईला 4-5 दिवस आमचं घर रहायला हवं होतं कारण तिने भाड्याने घेतलेले घर रीपेयर्स साठी बंद होतं. आम्ही विचार केला ठिक आहे. नाहितरी घर रिकामं आहे. आणि ती बाई तिथे राहिली तरी आपल्याला काही करावं लागणार नाही. पण घरी परत आल्यावर डोक्याला हात लावुन घ्यायची वेळ आली. एक तर ती बाई 4-5 दिवस म्हणुन प्रत्यक्षात 15 दिवस राहिली. तिने फ्रिजमधल्या सगळ्या भाज्या संपवल्या होत्या. ग्रोसरी संपवली होती. दुध सगळं संपवलं. कॉलिंग कार्ड सगळं वापरलं. व्हॅक्युम केलं नाही. त्यामुळे घरात सगळीकडे धुळ झाली होती. मी नवर्‍यासाठी लाटलेल्या पोळ्या आणि पराठे नवर्‍यानेही खाल्ले नव्हते. त्याने ते वाचवुन ठेवले ह्या विचाराने की आल्याआल्या बायकोला परत लाटायला नको. तर ह्या बाईने त्या सगळ्या पोळ्या आणि पराठे सुद्धा संपवले. रेस्टरूम मधे कमोड वापरलं ते सुद्धा स्वच्छ केलं नाही आणि वर पडलेले पिवळे डाग दिसायला नको म्हणुन वरती हार्पिक घालुन ठेवलं होतं. फ्लश केल्यावर तिने केलेला चालुपणा लक्षात आला. ग्रोसरी, दुध, फळं भाज्या वापरल्या ते ठिक आहे. पण निदान परत घरात आणुन तरी ठेवावं. खाली दुकान आहे. असही नाही की 4 कोस जावं लागतं. आणि डोक्यात तिडिक गेली की गावात पाय ठेवल्या ठेवल्या घरी परतत असताना तिने फोन केला की घरात दुध संपलं आहे. तुमच्या मुलीसाठी लागेल तेव्हा घरी येता येता रस्त्यात थांबुन विकत घ्या म्हनजे फजिती होणार नाही. संताप झाला नुसता. घराखाली दुकान आहे तर म्हणे मला दिसलं नाही. ही बाई स्वत: ह्या गावात 4 वर्षांपासुन नोकरी करतेय. खालचं दुकान नाही सापडलं तर अजुन माहिती असलेल्या दुकानातुन वस्तु आणता आल्या असत्या. एवढं करूनही वर आभार नाही की दिलगिरी नाही. अगदी हद्द च केली त्या बाईने :(.


हे काही ठळक अनुभव. बारीक सारीक अनुभव तर बरेच आहेत. त्यामुळे आता पाहुणे यायचे म्हटले की अंगावर काटाच येतो. ते पाहुणे नको, शारिरीक, मानसिक आणि आर्थिक झीज नको आणि एकुणच होणारा मन:स्ताप ही नको.

Friday, November 06, 2009

अल्बम

काल दुपारी सहजच मी जुने फोटो बघत होते. आमचं लग्न झाल्यानंतरचे फोटो... बाप रे नवरा किती बारीक दिसतो आहे आणि मी कसली बावळट दिसते आहे असे काही बाही कमेंट्स टाकत त्या फोटोंचं मी चविष्टपणे रसग्रहण करत होते :)... आणि एकापाठोपाठ एक अश्या अनेक कडु गोड आठवणी यायला लागल्या. कडु कमी आणि गोडच जास्त.

आमचं लग्न झालं तेव्हा मी आणि नवरा आम्ही दोघेही शिकत होतो. त्यामुळे मॅरीड स्टुडंट म्हणुन आम्हाला रहायाला घर मिळालं होतं. घर कसलं अगदी रानावनात असलेलं चंद्रमोळी (सिमेंटच) झोपडंच होतं. आजुबाजुला गर्द वनराई आणि सोबतिला असंख्य पक्षी आणि प्राणी. दोन पायाचे, चार पायाचे आणि सरपटणारे सुद्धा :).

तर आम्ही जेव्हा त्या घरात पाय ठेवला तेव्हा आमच्याकडे प्रत्येकी 2 सुटकेसेस, पुस्तकं आता बाहेर पडतात की काय इतक्या ठासुन भरलेल्या पुस्तकांच्या 4 ट्रंका, स्वयंपाकाच्या भांड्यांचं आणि त्यातच देव इत्यादी असलेलं एक आणि मसाले आणि इतर राशन असलेलं एक अशि दोन छोटी खोकी एवढंच सामान होतं. मला अजुनही आठवतय की गृहप्रवेशाच्या वेळेस सुद्धा शेजारच्या सरदारजी घरातुन कुंकु आणलं होतं. गृहप्रवेश तर झाला. घरात गेल्या गेल्या लक्षात आलं की अरे सगळीकडे नुसत्या मोठ्यामोठ्या काचेच्या खिडक्याच आहेत. आणि आपल्याकडे तर परदेच नाहीत. मग काय भराभर आपआपल्या सुटकेसेस उघडुन पांघरायच्या चादरी आणि माझ्या ओढण्या काढल्या आणि तात्पुरती परद्यांची सोय झाली.

हळुहळु संसार करायला आणि घर चालवायला काय काय लागतं ह्याचा अंदाज यायला लागला. नवरा 12 वी नंतर कायम घराबाहेरच होता आणि अश्या ठिकाणी होता जिथे त्याचा आणि चुलीचा काहीही संबंध आला नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्याची जबाबदारी आपसुकच पुर्णपणे माझ्यावरच होती. मला स्वयंपाक करता येत होता पण पुर्वी कधी जबाबदारी घेऊन करायची वेळच आली नव्हती ती आता आली होती. पण तरी सुरवातिचे काही दिवस जेव्हा दोघांनाही खुप भुक लागायची आणि पोटात कावळे कोकलायला लागायचे तेव्हा लक्षात यायचं बाप रे अजुन काहिच शिजवलेलं नाहिये. मग काय भराभर वरण भाताचा कुकर लावायचा. त्यावरून आमची परत भांडणं व्हायची कारण नवरा भाताचा कट्टर विरोधक होता आणि मी म्हणायचे की कणिक भिजवुन पोळ्या करायच्या आणि भाजी चिरून फोडणिला टाकायची त्यापेक्षा वरण भात लवकर होतो. आणि तसही नवरा कोकणस्थ आणि मी माहेरून देशस्थ त्यामुळे मला काही आमटी जमायची नाही आणि फोडणिचं वरण त्याच्या पसंतीस उतरायचं नाही त्यामुळे परत कुरकुर :).

आम्ही ज्या गावी राहायचो तिथे प्रचंड ह्युमिडिटी होती. त्यामुळे अन्न लवकर खराब व्हायचं म्हणुन मग तातडिने आधि फ्रिज घेतला. पण मला ह्युमिडीटीची अजिबातच सवय नसल्यामुळे मला खुपच त्रास व्हायला लागला. म्हणुन मग एसी घेतला. आम्ही राहायचो ते शैक्षणिक संस्थेच्या आवारात. तिथुन गाव होतं 12-15 किमी अंतरावर. मग घर लावायचं आणि चालवायचं म्हणजे भाजीपाला किराणा व इतर सामान आणायला तर बाहेर पडायलाच हवं. जायला यायला सोय व्हावी म्हणुन मग वाहन घेतलं कारण प्रत्येक वेळी वाहन हायर करून जाण्यापेक्षा स्वत:चे वाहन घेणे स्वस्त पडते. ह्या सगळ्या खर्चांमुळे आमची सगळी शिल्लक कामी आली. मग परदे घेणं पुढे ढकललं :) तात्पुरत्या परद्यांवर आम्ही खुश होतो :). मग आम्ही एक यादी केली होती. त्यात गरजेप्रमाणे प्रत्येक महिन्यात काय घ्यायचे हे लिहिले होते. त्यात परद्यांचा नंबर 5 महिन्यांनी आला आणि मिक्सर / फूड प्रोसेसरचा दिड वर्षाने :). तोवर आम्ही सगळं काम खलबत्त्यावर केलं :).

सुरवातीचे काही महिने आमच्या ज्या पुस्तकांच्या ट्रंका होत्या त्याच बैठकिच्या खोलीत बसायला वापरायचो. त्या जरा जुन्या होत्या. त्यामुळे त्यावर कोणि बसलं की लगेच त्या कुरकुरायच्या आणि मला हसु आवरायचं नाही :). पलंग येईपर्यंत आमची वळकटी आणि सिमेंटची फरशी यांची घट्ट मैत्री झाली होती. हळुहळु सामन जमत गेलं आणि आमचं बस्तान बसत गेलं. हे सगळं सुरू असताना एकिकडे अभ्यास, परिक्षा, असाईनमेंट्स , प्रोज़ेक्ट्स सुरूच होते. आम्ही दोघेही दोन वेगवेगळ्या खोलीत बसुन अभ्यास करायचो. तो त्यच्या लॅपटॉपवर मी माझ्या. तेव्हा एकाच घरात रहात असुन सुद्धा आम्ही तासंतास गूगल टॉक वर चॅट करायचो :). खुप मजा यायची. एकीकडे एसी, फ्रिज, लॅपटॉप( शैक्षणिक संस्थेच्या आवारात राहात असल्यामुळे इंटरनेट फ्री होते :))आणि दुसरीकडे बसायाला ट्रंका, झोपायला वळकटी आणि दारांना परद्यांच्या ऐवजी चादरी आणि ओढण्या असा प्रचंड विरोधाभास आमच्या घरी होता :). आणि आम्ही त्यात खुश होतो कारण तो आमचाच निर्णय होता. दोघांच्याही पालकांनी वेळोवेळी काहितरी निमित्याने, प्रसंगाने आम्हाला मदत करायचा प्रयत्न केला. पण आम्हाला आमचं घर उभारायच होतं ते आमच्या आई बाबांसारखच. आपल्या हिमतीवर, मेहनतीवर आणि नशिबावर. त्यामुळे जे जसं होतं त्यात आम्ही खुप खुश आणि पुर्णपणे समाधानी होतो आणि आहोत :).

आमच्या त्या घराला मागे एक छानसं अंगण होतं. तिथे रोज सकाळी मोर यायचा. पुढे पुढे आमची त्या मोराशी दोस्ती झाली तो आला की रोज मी त्याला काही काही खायला द्यायचे. आणि त्याच्याशी खुप गप्पा मारायचे :). त्याला ब्रेड खुप आवडायचा. ब्रेड चे तुकडे टाकले की अगदी खुश व्हायचा आणि खाऊन झाल्यावर कधि ठुमकत ठुमकत अगंणभर फिरायचा नाहितर आपल्या पिसांचा पसारा फुलवुन माझ्यासाठी खास नाच करायचा. नवर्‍याने काढलेले त्याचे फोटो आणि व्हिडीओ अजुन जपुन ठेवले आहेत आणि त्याने मला भेट दिलेले एक छानसे मोरपीस सुद्धा :).

खुप छान होते ते दिवस. रोज समोर एक नवं आव्हान असायचं. व्यक्तिगत नाहितर व्यावसायिक. पण दोघांनी मिळुन त्या सगळ्या प्रॉब्लेम्स ना तोंड द्यायला मजा यायची. नवर्‍याची साथ खमकी आणि खंबीर होती पण मायेचा हळुवार ओलावा सुद्धा होता. आजुबाजुचे लग्न झालेले मित्र मैत्रीणी बघितले आणि आमच्याकडे बघितलं की आम्हाला वाटायचच नाही की खरच आपलं लग्न झालेलं आहे. मला तर कायमच वाटायच की हा अजुनही माझा मित्रच आहे नवरा नाही. आणि नवर्‍याचेही माझ्याबद्दल काही वेगळे मत नव्हते :).

मी काल जो अल्बम बघत होते तो ह्याचमुळे केवळ फोटोंचा अल्बम नसुन सगळ्या आठवणिंचाच अल्बम आहे. ह्या सगळ्या आठवणी म्हणजे एखाद्या अस्सल अत्तराच्या कुपीसारख्या आहेत. कुपीतलं अत्तर कसं कुपी उघडल्याबरोबर बाहेरचं वातावरण गंधमुग्ध करतं. तश्याच ह्या आठवणी. पावसाच्या सरीसारख्या एकापाठोपाठ एक सरसरत येतात आणि कुपीतल्या अत्तरासारखा माझा उरलेला दिवस मुग्धतेने भारलेला करून जातात.

Friday, October 23, 2009

वासाचे घर

काल झी मराठी वर हसा चकटफू चा जुना भाग बघत होते... तो एपिसोड दीवाळी विषेश होता. त्यात एक सेल्समन फराळाच्या वेगवेगळ्या वासांचे परफ्युम्स विकत होता. जरा हटकेच कल्पना. तेव्हाच लक्षात आलं की आपल्या मनात / डोक्यात कितीतरी वास घर करुन असतात. दीवाळी च्या नुसत्या आठवणिनेच आपसुकच नाकाला फराळाच्या पदार्थांचे वास येऊ लागतात. मी लहान असताना आई मला विचारायची 'अगं रवा भाजल्याचा वास आला का गं?' किंवा 'बेसनाचा खमंग वास येतोय ना?' तेव्हा मी असायचे खेळत नाहितर दीवाळीचा होमवर्क पुर्ण करत. आणि आई फक्त मलाच विचारायची असं नाही तर त्यावेळेस घरात जो कोण असेल प्रत्येकाला विचारायची. आणि प्रत्येकाचा होकार आला की मगच तिचं समाधान व्हायचं. तिचं पदार्थ करण्याचं गणित असं बरेचदा वासावर अवलंबुन असायचं. तेव्हा मला तो प्रकार जरा गमतिशीर वाटायचा पण माझ्याही नकळत पुढे मी सुद्धा स्वयंपाक करताना वासावर काही गोष्टी ठरवु लागले.

असाच एक वास माझ्या मनात घर करुन बसलाय तो म्हणजे एका खोलीचा. बाबांच्या गावी आमचा खुप मोठा वाडा होता. त्यात एक प्रशस्त असे देवघर होते. जरासे अंधारे. पण तिथे मला खुप छान वाटायचे. एकप्रकारचा शांतपणा असायचा त्या खोलीत. आजोबा दररोज सकाळी तास दोन तास तिथे पुजा करायचे. मग उगाळलेलं चंदन, देवासमोर लावलेली मंद वासाची उदबत्ती, घरची ताजी खुडुन वाहिलेली मोगरा, गुलाब, कण्हेर, स्वस्तिक, जाई, जुई आणि चमेलीची फुलं, नुकतीच शांत झालेली समई आणि निरांजन, असा सगळ्यांचा मिळुन एक खुप छान प्रसन्न पण शांत, एक प्रकारचा गुढ गंभिरपणा असलेल्या वासाने ती खोली भरून जायची.

नव्या पुस्तकांचा वास कुणाला आवडत नाही? मी आणि दादा शाळा सुरु व्हायच्या आधी बाबांसोबत उड्या मारत जायचो नवीन वह्या पुस्तकं आणायला. तेव्हा अभ्यासाची ओढ कमी आणि त्या कोर्‍या वासाचेच आकर्षण जास्त असायचे. ती नवी कोरी न हाताळलेली पुस्तकं, त्यांना येणारा छापखान्यातील शाहिचा निसटता ओला वास, करकर वाजणारी नवी पानं आणि काही चिकटलेली पाने मिळाली तर खजिना सापडल्याचा आनंद. कारण ती चिकटलेली पाने सोडवायला मला आणि दादाला भयंकर आवडायचे आणि बरेचदा आमची त्यावरुन भांडणे पण झाली आहेत :) ... आई बाबांनी आम्हाला वाचनाची गोडी लागावी म्हणुन, वाचनालय चा निटस उच्चार सुद्धा करता येत नव्हता त्या वयापासुन आमच्यासाठी लहान मुलांच्या वाचनालयाची मेंबरशिप घेतली. तरीसुद्धा पुढे कधिमधी चंपक, चांदोबा, कुमार, कीशोर अशी नविन मासिक विकत आणली की सगळ्यात आधि मी त्या पुस्तकांचा भरभरुन वास घ्यायचे :).

मला आवडणारा आणि माझ्या मनात घर करून बसलेला असाच एक वास म्हणजे माझी आई जी उशी वापरते त्या उशीचा वास. त्या उशीला शिकेकाईचा मंद सुवास येतो. माझी आई अजुनही केस धुवायला शिकेकाईच वापरते. त्यामुळे तिच्या केसांना जसा शिकेकाईचा सुंदर वास येतो तसाच तिच्या उशीलाही येतो. आताही मी जेव्हा केव्हा माहेरी जाते मला आईच्या उशीवर डोके ठेवुन झोपायला खुप आवडते.

मला आणि बहुतेकांना आवडणारा असाच एक वास म्हणजे लहान बाळांचा वास. लहान बाळांना काय सुंदर वास येतो. नुकतेच न्हाऊ माखु घातल्याचा वास, मालिश केलेल्या तेलाचा वास, मऊ उबदार मलमलच्या कपड्यांचा वास, जावळाचा वास, मऊ मऊ हाताचा वास, आणि कळस म्हणजे जॉन्सन च्या पावडर चा वास. मन कितीही उदास झालं असेल, राग आला असेल, हताश वाटत असेल तरीही लहान बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि भरभरून त्याचा वास आपल्या नाकात भरुन घेतला की कसं आश्वासक वाटतं. अनुभव घेतला नसेल तर नक्की घेऊन बघा मी काय म्हणते ह्याची कल्पना तुम्हाला येईल.

मला अजुन एक आवडणारा वास म्हणजे बैंगनफल्ली आंब्याचा. आता काही जण म्हणतील हा कुठला बरं आंबा? विदर्भातल्या लोकांना तर सांगायलाच नको. पण बाकिच्यांना हा आंबा कदाचित बदामी आंबा म्हणुन ठाऊक असेल. आम्ही खुप लहान असताना नागपुरला हापुस आंबा काही मिळायचा नाही. त्यामुळे आंबा म्हणजे बैंगनफल्ली असं समीकरण डोक्यात फिट्ट बसलं होतं. बैंगंफल्लीचा रस, मिल्कशेक, किंवा तोच रस आणि मिल्कशेक उरवून आता जात नाहिये मला म्हणुन गुपचुप फ्रिज मधे जमवलेलं आणि नंतर दादाला चिडवत चिडवत खाल्लेलं आईसक्रिम आणि कुल्फी, ते खाल्ल्यावर डेझर्ट कुलर च्या गारव्यात आईच्या जुन्या सुती साड्यांची पांघरलेली गोधडी आणि साखर(आंबा)झोपेत सरलेली रणरणती दुपार. अश्या बर्‍याच आठवणी ह्या आंब्याशी जोडल्या आहेत. पुण्याला येईपर्यंत तर मला हापुस आंबा अजिबात आवडत नसे. आता माझं मलाच खरं वाटत नाही. पण तेव्हा हापुस विरुद्ध बैगनफल्ली ह्या लढाईत बैंगनफल्ली साठी प्राणापलिकडे लढायची. मग हळुहळु हापुस वरचा राग ओसरला.असली हापुस आंब्याची गोडी कळली आणि हापुस आंबा माझा झाला. पण आजही कदाचित हापुस आणि बैगनफल्ली दोन्ही आंबे माझ्यासमोर ठेवले तर कदाचित माझ्या लहानपणिच्या सुवासाच्या आठवणी परत ताज्या करण्यासाठी कुणासठाऊक मी बैंगनफल्लीच उचलेन :).

आता मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही हसाल पण मला ना पेट्रोल चा वास प्रचंड आवडतो. काही जण नाकं मुरडतील ही कसली आवड. पण खरच मला पेट्रोल चा वास खुप आवडतो. त्यामुळे मी लहान असताना जेव्हा केव्हा बाबा पेट्रोल भरायला जायचे तेव्हा मला जायचच असयाच त्यांच्या सोबत. बाबांना तेव्हा ही आवड काही माहिती नव्हती. आता हा लेख वाचल्यावर मात्र बाबांना कळेल की लहान असताना पेट्रोल भरायला जाताना का जायचा हट्ट करायची.


असे अजुन बरेच वास माझ्या मनात रुजले आहेत. आय आय टी मधे असताना सगळ्या मोसमात रस्त्यांच्या दुतर्फा भरलेल्या, फुललेल्या आणि लगड्लेल्या झाडांचा वास, शेजारच्या बेकरीमधे भाजल्या जाणार्‍या ताज्या ब्रेड चा वास, आजीने घातलेल्या आणि नाकाला झोंबणार्‍या लाल मिरचीच्या चुरचुरीत फोडणीचा वास, शेणाचा सडा घातलेल्या ओल्या अंगणाचा वास, नवर्‍याने रोज सकाळी पुजा केली की त्याच्या हाताला येणारा अष्टगंधाचा वास आणि असेच अनेक वास. लिहायला बसले तर प्रत्येकावर एक एक स्वतंत्र लेख होईल. पण तूर्तास इथेच थांबवते :). Wish you a fragranceful day ahead :).


फोटो - गुगल इमेजेस वरून.

Monday, October 19, 2009

ब्लॉग चा वाढदिवस

आज माझा ब्लॉग बघता बघता 3 वर्षांचा झाला. ब्लॉगर वर खाते उघडले जुलै 06 मधे पण पहिली पोस्ट टाकली 19 ऑक्टोबर 06 ला त्यामुळे तोच खरा जन्मदिवस.



हा केक खास माझ्या ब्लॉग साठी...

ब्लॉग ची सुरुवात खरतर एकटेपणातुन झाली... म्हणजे नवरा होताच ( इनफॅक्ट ब्लॉग सुरु करायला नवर्‍यानेच प्रोत्साहन दिलं आणि ब्लॉगर वर खातेदेखिल त्यानेच उघडुन दिले. ) पण त्यावेळी आम्ही दोघेही शिकत होतो, आपापल्या लोकांपासुन, घरापासुन आणि गावापासुन दूर. आणि बरिचशी दोन ध्रुवावर दोघे आपण अशिच गत होती. मला सुटी तर त्याची परीक्षा आणि त्याला सुटी तर माझी परीक्षा. मग बरच काही बाही मी ब्लॉग वर लिहायची अगदी एखाद्या डायरी प्रमाणे. जे मनाला येईल ते, जे वाटेल ते आणि जसं वाटेल तसं. अगदी एव्हरीथिंग अंडर द सन. (आता मागे जाऊन बघु नका ;) त्या पोस्ट्स मी पब्लिक केलेल्या नाहीत. :-) )

ब्लॉग सुरु केल्यावर एक वर्ष अभ्यास आणि संसार सांभाळून माझ्यापरीने नियमीत पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला. पण नंतर दोघात तिसर्‍याच्या नुसत्या चाहुलीनेच अगदी दाणादाण उडवुन दिली. परत काही महिने ब्रेक घेतला परत थोड्याफार पोस्ट्स टाकल्या. पण कन्येच्या प्रत्यक्ष आगमनानंतर मात्र जवळजवळ एक वर्ष मी काहिही लिहिले नाही.

गेल्या जुनपासुन परत लिहायला घेतलं. फार काही लिहिलं नाही. उगाच आपली बाष्कळ बडबड. पण लिहिती झाली ह्याचच समाधान.

ह्या सर्व दिवसांत, वर्षांत लिहित असताना किंवा नसताना मराठीब्लॉग्स मात्र अगदी रेग्युलर बघत होते वाचत होते. परत लिहायला लागले ह्याचे सगळे श्रेय मी मराठीब्लॉग्स वरच्या सर्व ब्लॉगर्सना देते ज्यांच्यामुळे मला लिहायचा हुरुप आला. आणि त्यांच्या एनकरेजिंग कॉमेंट्स मुळे अजुनतरी तो उत्साह टिकुन आहे.

आज माझ्या लाडक्या ब्लॉग च्या वाढदिवसाचे निमित्य साधुन अजुन गोष्ट सांगायची म्हणजे लवकरच ह्या ब्लॉग ला एक भावंड आणण्याचा विचार आहे. पाककृतिंवर आधारित आपला एक ब्लॉग सुरु करावा असा बरेच दिवसांचा विचार प्रत्यक्षात आणावा म्हणतेय. ( आता तुमच्यापैकी काही जण म्हणतिल की एक ब्लॉग सांभाळुन होत नाही तिथे हा दुसरा ब्लॉग? ) पण असो प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे नाहि का? तर ह्या नव्या ब्लॉग चं नाव काही केल्या सुचत नाहिये. तुम्हाला सुचलं तर मला नक्की सांगा.

विषयांतर व्हायच्या आत ही पोस्ट इथेच संपवते. :-).

Happy B'day to you my dear blog. May you live all the days of your life. :-)


फोटो - गुगल इमेजेस वरून.