Monday, July 20, 2009

कालच काकुशी बोलणं झालं. बोलता बोलता काकु म्हणाली की आज पुडाच्या वड्या केल्या आहेत. आणि इकडे माझ्या जिभेवर पुडाच्या वड्यांची चव रेंगाळली. महेंद्रजींचं कालचं पोस्ट आणि नंतर काकुशी झालेलं बोलणं, माझं मन नकळत बालपणीच्या खादाडी च्या आठवणिंत रमलं.

तशी मी मुळची नागपुरची. ज़न्मगाव भंडारा पण सगळं बालपण आणि शालेय शिक्षण नागपुरात. दहावी नंतर मात्र वडीलांच्या बदली मुळे आम्ही पुण्याला आलो आणि तिथेच स्थिरावलो. पण अधुन मधुन नागपुरला जाणं होतंच. नागपुरला गेल्यावर पहिलं काम करायचं म्हणजे खादाडी चे प्लॅन्स ठरवायचे आणि ते अमलांत आणायचे. नागपुरला अश्या बर्‍याच जागा आहेत पण वेळेअभावी नेहेमीच सगळीकडे जाता येतं असं नाही. तरिही जास्तीतजास्त जागी जाता येइल असा प्रयत्न असतो.

माझी सगळ्यांत पहिली आवडती जागा म्हणजे पंचशिल टॉकीज जवळचं शांती भवन. मी दक्षिण भारतीय पदार्थांची अस्सल भक्त आहे. आणि शांती भवन मधे मिळणारे जवळ जवळ सगळेच दक्षिण भारतीय पदार्थ म्हणजे लाजवाब. गरम गरम, एकदम मउ आणि हलकी ईडली आणि त्यावर वाफाळता सांबार म्हणजे माझा जीव की प्राण. ईडली शिवाय तिथला दोसा, उत्तपा आणि मैसूर बोंडा पण मस्त असतो. शांती भवन ला जायचं तर सकाळी सकाळी नाश्ता करायला 07.30 / 08.00 पर्यंत. त्यावेळेस जी काही क्षुधाशांती होते ती केवळ अवर्णनीय. दुपारनंतर त्याच पदार्थांना सकाळसारखी चव नसते हे माझं मत.

शांती भवन खालोखाल नंबर लागतो तो धरमपेठेत वेस्ट हायकोर्ट रोडवर असणार्‍या साउथ इंडीया मेस चा. तिथला कुरकुरीत दोसा म्हणजे अहाहा. पण हल्ली तिथली चव पुर्वीसारखी राहिली नाही. असेच छान छान दक्षिण भारतीय पदार्थ मिळण्याची अजुन दोन ठिकाण म्हणजे नैवेद्यम आणि सिव्हील लाईन्स मधले ---स्वामी त्याचं पुर्ण नाव मला आठवत नाही पण तिथे उभं राहुन खावं लागायचं एवढं मला नक्की आठवतं. धरमपेठेत चौकातच नंद भंडार आणि त्याच्या थोडच पुढे राज भंडार नावाची दोन दुकानं आहेत. तिथे समोसा, कचोरी आणि साधा पेढा खुप छान मिळतो. सकाळी 8 / 9 वाजता आणि दुपारी 3 / 4 वाजता तिथुन गेलात तर समोसा आणि कचोरी तळण्याचे खमंग वास येतात. तिथुन थोडं पुढे गेलं की शंकरनगर चौकात संध्याकाळी ठेल्यांवर चटपटीत चाट आणि पाणिपुरी मिळायची. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की बाबांसोबत मी आणि दादा जायचो तिथे चाट आणि पाणिपुरी खायला शिवाय येताना वाटेत दिनशॉ चं आइस्क्रीम खाल्ल्याशिवाय आमची खादाडी पुर्ण व्हायची नाही. आता तिथे ते ठेले आहेत की नाही माहिती नाही.

आनंद भंडार तर माझं अतिशय लाडकं. तिथे निरनिराळ्या बंगाली मिठाया खाल्ल्या की रसना कशी तृप्त होते. रसदार, तोंडात टाकल्याबरोबर विरघळणार रसगुल्ला असु दे नाहि तर त्याचिच बहिण चमचम. सोबतिला मऊ लुसलुशीत ताजे संदेश आणि मिष्ठी दोइ खावे तर तिथलेच. माझ्या (जुन्या) माहितीप्रमाणे त्यांच्या दोन शाखा आहेत. एक धरमपेठेत वेस्ट हायकोर्ट रोड्वर आणि एक सिताबर्डी वर. पुर्वी आनंद भंडार मधे फक्त बंगाली मिठाई मिळायची आता तिथे अनेक प्रकारचे स्नॅक्स पण मिळतात. आनंद भंडार सारखच अजुन एक ठिकाण म्हणजे हल्दिराम.हे देखिल धरमपेठ आणि सिताबर्डी दोन्ही ठिकाणी आहे. हल्दिराम आणि आनंद भंडार म्हणजे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. एकाच एरियात असल्यामुळे आपल्याकडे गिर्‍हाइकांना कसे खुश ठेवता येइल आणि गिर्‍हाइक जोडुन ठेवता येइल ह्याकडे त्यांचे सतत लक्ष असते. त्याचा परिणाम म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला दर्जेदार पदार्थ प्रसन्न वातावरणात उपभोगता येतात. हल्दिराम मधे पेपर दोसा / मसाला दोसा, मऊ तरिही कुरकुरीत भटुरा आणि स्पाईसी छोले असं काय काय तुडुंब खाऊन झाल्यावर शेवटी हल्दिरामचाच रसरशीत मोतीचुर चा लाडु किंवा अनारकली नावाची बंगाली मिठाई म्हणजे सोने पे सुहागा.

असच अजुन एक ठिकाण म्हणजे सेमिनरी हिल्स जवळ टेकडीवर हनुमानाचं एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या पायथ्याशी असंख्य प्रकारचे समोसे, वेगवेगळ्या कचोर्‍या, आणि अनेक चट्पटीत पदार्थ मिळतात. पानाच्या द्रोणात गरम गरम चटकदार समोसा किंवा कचोरी खायला जी काही मजा येते ती शब्दातीत. फिरायला जाताना मंदिरात जाणे हा तर एक बहाणा असतो. खरं उद्दिष्ट्य असतं ते पायथ्याशी मिळणारा प्रसाद खाण्याचं :).

गणगौर च नाव घेतलं नाही तर खादाडीची ही सफर पुर्ण होऊच शकत नाही. गणगौर मधे मिळणारी राज कचोरी नुसती आठवली तरी तोंडाला पाणि सुटतं. सिताबर्डी सारख्या बाजाराच्या ठिकाणी असल्यामुळे इथे कायमच गर्दी असते. शिवाय जगत ची थाली, दिलीप कुल्फी, घुगरे ह्यांची कचोरी आणि तिच्यासोबत मिळणारी लाल चटणी आणि संत्रा बर्फी, सिताबर्डी मेन मार्केट रोडवर अपना बझार च्या गल्लिच्या कोपर्‍याशी मिळणारा चना जोर गरम, लोकमत बिल्डिंग च्या चौकात कोपर्‍यातल्या दुकानात (नाव आठवत नाही) मिळणारे चाट चे असंख्य प्रकार, धंतोलीत अहिल्यादेवी मंदीरात मिळणारे टिपीकल महाराष्ट्रियन पदार्थ.... अशि अजुन बरीच ठिकाणं आहेत त्यामुळे आता आवरतं घेते, खुप भुक लागली आहे. काहितरी खायला हवं :)

Thursday, July 09, 2009

मराठी की इंग्रजी?

मराठी की इंग्रजी...मराठी की इंग्रजी...सध्या ह्या विचाराने डोकं भणभणायला लागलं आहे...

आत्ता कुठे माझी पोर बोबडे बोल बोलु लागली ( वय 1 1/2 वर्षे ) आणि हौसेने आम्हीही तिला चित्रांचं पुस्तक आणुन 'तो बघ काऊ , ती बघ चिऊ, हा वाघोबा बरं का..असे काही बाही शिकवायला लागलो. पण थोड्याच दिवसात लक्षात आलं की पुढे वर्ष दिड वर्षाने जेव्हा शाळेत ऍडमिशन साठी इंटरव्यु होइल तेव्हा हे काऊ, चिऊ आणि वाघोबा कामी येणार नाही... तेव्हा तिला A for Apple हेच उत्तर द्याव लागेल.


झालं हा विचार जेव्हापासुन डोक्यात आला तेव्हापासुन सारखं वाटतं की मराठीत शिकवायचं की इंग्रजीत शिकवायचं? आम्ही परदेशात जरी राहात असलो तरी घरी पुर्णपणे मराठी वातावरण आहे आणि घरी बोलतो पण मराठीतच. त्यामुळे आताकुठे लेकिची मराठी भाषेशी ओळख व्हायला सुरुवात झाली आहे तर लगेच दुसरी भाषा तिच्यावर लादणे कितपत योग्य आहे? ( ह्या वरताण म्हणजे शेजारी पाजारी तिच्याशी अजुन तिसर्‍याच भाषेत बोलतात :-) ) आणि पुढे तिच्या शालेय शिक्षणाचा विचार करता इंग्रजीत शिकवणेच योग्य ठरतं.

आम्हीसुद्धा आधि सगळं मराठीतच शिकलो पण आज दोघांनाही इंग्रजीची उत्तम जाण आहे. पण परत मनात असाही विचार येतो की समजा आज शिकवलं सगळं मराठीत तरी आमचं विंचवाचं बिर्‍हाड. आज इथे तर दोन / तिन वर्षाने अजुन कुठे. त्यामुळे शिक्षण पुढे उच्चशिक्षण हे सगळं इंग्रजीत होणार हे नियतीने आधिच ठरवलेले. मग अश्यात इंग्रजीत शिकवणेच योग्य. पण म्हणुन आपल्या मातृभाषेत शिकवायचं नाही का? मग तिला मराठी येइल कसे? परदेशात राहुन मोडकं तोडकं मराठी बोलणारे पण मराठी वाचता न येणारे, मराठीत बोललेलं कळणारे पण मराठीत बोलता न येणारे किंवा अजिबातच मराठी न येणारे अनेक लहान मुलं बघितली आहेत. आपली लेक तशी होउ नये असे मनापासुन वाटते.

हे सगळे विचार हल्ली डोक्यात गर्दी करतात. पण मला असं वाटतं की ही पण एक पासिंग फेज़ आहे. आपण नेटाने प्रयत्न केला तर तीला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा निट अवगत होतिल. गरज आहे ती फक्त थोड्या संयमाची. बघुया पुढे काय होते ते :-) ...

Thursday, July 02, 2009

Soulmate (भाग 3 )

रुची आणि त्या तरुणाची पहिली भेट होउन आता 5-6 महिने झाले होते. दोघांनीही एकमेकांना नजरेनच जोखलं होतं, ओळखलं होतं आणि स्विकारलं होतं.

त्या दिवशी रुची ला खाली पार्क मधे जायला जरा उशिरच झाला. बघते तर तो एका बेंचवर बसला होता. तिची वाट बघत असल्यासारखा. आश्चर्य म्हणजे आज पार्कमधे त्याच्याशिवाय कोणिही नव्हतं. मग तिला आठवलं की कालच शेजारच्या बाई तिला सांगत होत्या की आता मुलांची परिक्षा सुरु होणार आहे. कदाचित मुलं अभ्यास करत असतील, तीने स्वत:शिच विचार केला. आणि त्या तरुणाच्या समोरच्या बेंचवर जाउन बसली. त्याच्याकडे बघुन कळेल न कळेलसं हळुच हसली. त्याने ही हलकेच हसुन प्रतिसाद दिला.


"किती उशीर केलास भेटायला... मी किती वर्षं वाट बघतोय." तो म्हणाला. " हो ना.. उशिर झाला खरा. जाउ दे.. कसा आहेस?" भारावलेली रुची म्हणाली. " मी ठिकच आहे म्हणायचं. वेड्यासारखा तुझा शोध घेत फिरत होतो. शेवटी 6 महिन्यांपुर्वी इथे भेटलीस." आणि त्यांचे हितगुज सुरुच रहिले. दोन जीव कितीतरी वर्षांनी भेटले होते. काळवेळ ह्यांच्या सीमा ओलांडुन, जन्मांचे फेर धरत चुकवत, एकमेकांशी जडु बघत होते.

दोघांनाही एकमेकांची ओळख पटु लागली. ते द्वैत एकाकार होउ लागले. आणि एकमेकांत असलेल्या आत्मिक अद्वैताची खात्री पटली. दोघांचाही वर्तमान जन्मातील आत्मिक शोध संपला होता. अतिव आनंदाने दोघांचेही डोळे पाझरु लागले. रुची ला तो क्षण घट्ट धरुन ठेवावा असं वाटलं. काय नव्हते त्या क्षणात, मन:शांती, समाधान, आनंद, आयुष्यातले सगळे जीवनरस त्या एका क्षणात एकवटले होते. त्या एक क्षणाने त्या दोघांनाही पुर्णत्व प्राप्त करुन दिले होते. त्यांचा हा जन्म सार्थकी लागला होता.


आणि रुची ने अलगद आपले डोळे उघडले. अजुनही ती भारलेल्या अवस्थेत होती. तो तरुण तिच्यासमोरच बसला होता. दोघांची नजरानजर झाली आणि त्यांचे चेहरे उजळुन निघाले. शिव आणि शक्ती चे ही अद्वैत रुप मोहक होते. पण लगेचच त्याचा चेहरा दु:खाने झाकोळला. त्याला वर्तमानाची जाणीव झाली. त्याने प्रथमच तिच्याशी संवाद साधला आणि तिला सांगितले की त्याची दुसर्‍या देशात बदली झाली आहे आणि 2 दिवसातच तो त्याच्या कुटुंबासोबत जायला निघणार आहे. आणि हे सांगण्यासाठीच तो तिची वाट बघत होता. तिने त्याला विचारले की आता परत कधी भेटणार त्यावर तो म्हणाला आजसारखचं somewhere...sometime.... एवढं सांगुन तो जाण्यासाठी पाठमोरा वळला.


रुची हळहळली, आत्ता कुठे नात्याची जाणीव झाली होती की परत हा पाठशिवणीचा जीवघेणा खेळ सुरु झाला होता. परंतु क्षणार्धातच ती सावरली आणि तिचं मन भरुन आलं.तिचा शोध संपला होता. आज तिला तिचा Soulmate भेटला होता.

Wednesday, July 01, 2009

Soulmate (भाग 2 )

मग नजरेचे हे खेळ रोजचेच झाले. रुची संध्याकाळी पार्क मधे जायची तेव्हा तो आधिच आलेला असायचा. कुणाची तर वाट बघत असल्यासारखा. रुची दिसल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचा,'ती आज दिसेल की नाही' चा संभ्रम हलकेच सैल व्हायचा. रुची सुद्धा त्याच संभ्रमात असायची आणि तो दिसल्यावर कळत नकळत तिला स्वस्थता लाभायची. हळुहळु शेजारणीं कडे चौकशी केल्यावर तिला कळले की तो कोणत्या तरी दुतावासात काम करतो. तो, त्याची बायको आणि त्यांची छोटी मुलगी तिथे 3 वर्षांपासुन रहात आहेत आणि त्याची बायकोही कुठेतरी नोकरी करते. पण रुची ला त्याचे नाव आणि त्याचा देश मात्र कळु शकले नाही.

रुची ने स्वत:ला आवर घालण्याचा बराच प्रयत्न केला. हरप्रकारे मनाची समजुत घातली. तो विवाहित आहे, एक छोटी मुलगी आहे, आपल्याला त्याचं नाव गाव काहिच माहिती नाही आणि सरतेशेवटी तो एक परदेशी आहे. पण त्याच्याबद्दल तिला इतके जबरदस्त आकर्षण वाटत होते की ही सारी कारणे त्यापुढे फोल ठरायची. ती अक्षरश: लोहचुंबकासारखी त्याच्याकडे खेचल्या जायची.

पण ह्या सार्‍या प्रकारात रुची ला त्याच्याबद्दल शारीरीक आकर्षण कधिच वाटले नव्ह्ते. वाटायची ती केवळ अनामिक ओढ. का कोण जाणे पण तो सुद्धा आपल्याकडे ओढल्या जातोय असे सारखे तिला वाटायचे. त्याच्याही डोळ्यांत तिला कधिही लालसेचा लवलेशही दिसला नाही. त्या नजरेत जे काही होतं ते नितळ, निर्मळ आणि निरागस होतं. आपलसं वाटणारं आणि आपलसं करणारं होतं. आणि ह्याचे तिला बरेचदा आश्चर्य वाटायचे. की हे असं कुठलं नातं आहे जिथे दोन पुर्णपणे अनोळखी व्यक्ती एकमेकांची नाव साधी नावं सुद्धा माहिती नसताना इतक्या प्रचंड वेगाने एकमेकांकडे खेचल्या जात आहेत. ते ही आदिभौतीक पातळीवर. तिथे कसलीच अपेक्षा नव्हती. शारिरीकही नाही आणि मानसीकही नाही. प्रतिक्षा होती ती केवळ Relate करण्याची आणि होण्याची.

कधि एकदा संध्याकाळ होते आणि त्याला डोळाभर बघते असे रुचीला व्हायचे. त्याच्या त्या शांत निळ्या डोळ्यांत डोकावुन बघताना सगळं कसं विसरायला व्हायचं. आजुबाजुचं भानच सुटायचं. आणि त्या नंतर मिळायची ती अपुर्व शांती. सारं जग त्या क्षणी थांबल्यासारखं वाटायचं. स्तब्ध आणि निश्चल.


दोघेही केवळ भारावल्यासारखे जणु नजरेनेच बोलायचे. जसे काही जन्मोजन्मी ते दोघे भेटत आले होते. अनोळखी व्यक्ती बद्दल वाटणारी प्रचंड ओढ, अनामिक आकर्षण आणि एका नजरेतच हा तर माझ्याच अस्तित्वाचा भाग आहे असे वाटायला लावणारी संवेदना. हे पुर्वजन्माचे संचित नाहितर काय आहे? पण अश्याही परिस्थितीत दोघांनाही वर्तमानाची जाणीव होती. दोघांनाही आपाआपल्या मर्यादा ठाउक होत्या.

रोज खाली आल्यामुळे दोघांमधे थोडा मोकळेपणा आला होता. कधितरी एखादं मंदस्मित, कधि हाय - हॅलो ची देवाणघेवाण सुरु झाली. पण ते तेवढ्यापुरतच. त्यांच्यात संवाद नव्हता आणि दोघेही संवाद घडावा म्हणुन जाणुन बुजुन प्रयत्नही करत नव्हते. एकमेकांशी बोलण्याची त्यांना कधी गरजच वाटत नव्हती. गरज होती ती फक्त मनं रिती होण्याची.

आणि अश्यातच तो दिवस आला...


(क्रमश:)

;;